पोलिसांचे प्रसंगावधान युवा शेतकऱ्यासह कुटुंबाचे वाचले प्राण

( अस्मानी व सुलतानी संकटाच्या कचाट्यात सापडलेल्या युवा शेतकरी व कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न फसला )
महागाव प्रतिनिधी
तीन वर्षांपासून पावसामुळे शेतीत होत असलेली नापिकी व नाल्याच्या पाण्यामुळे शेतीचे होत असलेले नुकसान त्यात विम्यासह शासनाकडून कुठलीच आर्थिक मदत मिळत नसल्याने हतबल झालेल्या युवा शेतकऱ्याने तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.परंतु पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे शेतकरी कुटुंबाला ताब्यात घेतल्याने अनुचित प्रकार टळल्याची घटना आज दुपारी १ च्या सुमारास महागाव येथे घडली असुन स्वप्नील बंडू कदम रा.हिवरा(संगम)असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे .

महागाव तालुक्यातील हिवरा(संगम) शिवारात स्वप्नील कदम यांचे शेत असुन मागील वर्षी झालेल्या पावसाळयात ढगफुटी सदृश्य पावसाने शेतातील संपूर्ण पिके नेस्ताबुत झाली.पीक विमा कंपनी आणि तालुका प्रशासनाला याची माहिती दिल्यानंतर पंचनामा करण्यासाठी कोणीच आले नाही.हीच स्थिती पुन्हा याही वर्षी पावसाने केल्याने कदम हवालदिल झाले . झालेल्या नुकसानीचा शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी वारंवार महसुल प्रशासनाकडे केली.परंतु गेंड्याची कातडी पांघरलेल्या निबरगट्ट प्रशासनाने या पिडीत शेतकऱ्याला बेदखल केले वारंवार मागणी करून आपली कोणीच दखल घेत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने नुकसान भरपाई न मिळाल्यास १ ऑगस्ट रोजी सहकुटुंब तहसील कार्यालयात आत्मदहन करणार असल्याचे निवेदनातून सांगितले.आणि या आत्मदहनास तालुका प्रशासन आणि विमा कंपन्यांवर कोणताच अंकुश नसल्याने या बेलगाम कारभाराला केवळ मुख्यमंत्रीच जबाबदार असल्याचे सांगून आपल्याला आत्मदहन करण्यास ही नोकरशाही व राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच जबाबदार असल्याचे सांगितले.त्यामुळे पोलिस प्रशासन आणि तालुका प्रशासन हादरून गेले. शेतकऱ्याने सह परिवार आत्मदहन करण्याचे निवेदन देवुन सुध्दा प्रशासनाने गांभीर्याने घेतले नसल्याने.अखेर आज दिनांक १ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास शेतकरी कदम यांनी आपले वृध्द आई वडील,पत्नी व मुलासह तहसील कार्यालय गाठून आत्मदहनाचा प्रयत्न केला.परंतु पोलिसांनी प्रसंगावधान राखून पिडीत शेतकरी व त्यांच्या कुटुंबाला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टाळला. परंतु आपल्याला न्याय मिळणार नाही तो पर्यंत मागे हटणार नसल्याची भुमिका पिडीत शेतकरी कुटुंबाने घेतल्याने तहसीलदार विश्वंभर राणे , पोलिस निरीक्षक धनंजय निळे , कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी या शेतकरी कुटुंबा सोबत चर्चा करून तत्काळ नुकसानीचा अहवाल आणि नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगुन शेतकरी व कुटुंबाला आत्मदहन करण्यापासुन परावृत्त केले.यावेळी तहसील परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच बळीराजा पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते,शेतकरी कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष देवानंद पाटील मोरे यांनी पिडीत शेतकरी कुटुंबाची भेट घेवुन शासन दरबारी न्याय मिळविण्यासाठी आपण शेतकऱ्यांसोबत उभे असल्याचे सांगितले
चौकट
हिवरा(संगम) येथील शेतकरी स्वप्निल कदम यांनी आपल्या परिवारासह आज तहसिल कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याने त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे मदत मिळण्यासाठी शासकीय स्तरावरून समाधान झाले आहे.तसेच त्यांचा विम्याचा दावा सुद्धा निकाली काढण्यात आला आहे.
:- विश्वंभर राणे(प्रभारी तहसीलदार महागाव)