चातारी येथे राष्ट्रमाता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांचा संयुक्त जन्मोत्सव साजरा

डॉ.वसंत हंकार यांच्या हृदयस्पर्शी वाणीने उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यातून निघाले अश्रू
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798386192
उमरखेड तालुक्यातील चातारी येथे राष्ट्रमाता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद आणि पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातेमा बी यांच्या संयुक्त जन्मोत्सवाचे आयोजन दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे पहिल्या सत्राचे अध्यक्षस्थानी उमरखेड महागाव विधानसभेचे माजी आमदार माननीय विजयराव खडसे हे होते. अध्यक्षांचे हस्ते दीप प्रज्वलन आणि महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. चातारी येथील लहान लहान बालिकांनी राष्ट्रमाता जिजाऊची वेशभूषा करून याप्रसंगी राष्ट्रमाता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, फातेमा बी शेख, स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या अनेक महामानवांनी अंधारात चाचपडत पडलेल्या समाजासाठी केलेल्या महान कार्याची गाथा आपल्या शब्दातून व्यक्त केली. चातारी येथे मागील २३ वर्षापासून या महामानवांच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्याचे कार्य येथील शिवाजीराव माने हे करीत आले आहेत याचाच परिणाम म्हणून की काय चातारी हे गाव महामानवांच्या विचारांचे प्रचार प्रसार करणारे गाव म्हणून प्रसिद्ध असल्याचे वक्तव्य माजी आमदार विजयराव खडसे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून व्यक्त केले. या

महापुरुषांनी केलेले जे कार्य आहे ते कोणत्याही एका जाती धर्मासाठी नसून त्यांचा केंद्रबिंदू फक्त मानव आणि मानव हाच होता आणि अशा महामानवांचे विचार आपल्या जीवनात तंतोतंत उतरवित आयुष्याचा प्रवास करीत समाजामध्ये या महामानवांची विचारधारा रुजवुन जाती धर्मामध्ये वाटलेल्या समाजाला एक दिशादर्शक असणारे व्यक्तिमत्व शिवाजीराव माने या गावाचे भूषण आहे असेही ते पुढे म्हणालेत. कार्यक्रमाचे दुसरे सत्र दुपारी ४:०० वाजता सुरू झाले. डॉ. वसंत हंकारे यांनी”आई बाप समजून घेताना”या विषयावर आपल्या रसाळ हृदयस्पर्शी वाणीने विचार व्यक्त करून उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी उपस्थित प्रेक्षकांमधून स्त्रियांसह पुरुषवर्गही आपल्या हुंदक्यांना आवर घालू शकला नाही.