शैक्षणिक

शाळेची बस पलटी होऊन एका निष्पाप मुलीचा दुर्दैवी मृत्यू:मुलांच्या शिक्षण व सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणी वर

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड :- यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात आज एक हृदयद्रावक घटना घडली. इंग्लिश मीडियम शाळेची बस पलटी होऊन एका निष्पाप मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे. दिवटपिंप्री येथील कु. महिमा सरकाटे हिच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

इंग्लिश मीडियम शाळांची हवा आणि पालकांची विवशता
आजच्या काळात इंग्लिश मीडियम शाळांचे महत्त्व आणि आकर्षण प्रत्येक पालकाला मोहवते. आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडावे, त्यांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून पालक हजारोंची फी भरून या शाळांमध्ये मुलांना पाठवतात. मात्र, या शाळांची कार्यक्षमता, वाहनांची देखभाल आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांकडे पालक कधीही गांभीर्याने पाहत नाहीत.

अपघातास कारणीभूत ठरलेल्या बसचा स्टीयरिंग रॉड तुटला, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. काही ड्रायव्हर्स मद्यप्राशन करून बस चालवतात, अशी चर्चा देखील नागरिकांमध्ये सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्याची गरज
जिल्हा परिषदेच्या शाळा गावागावात उपलब्ध असल्या तरी त्या शाळांमध्ये अपेक्षित दर्जाचे शिक्षण मिळत नसल्याने पालक मुलांना इंग्लिश मीडियमच्या शाळांमध्ये पाठवतात. यामध्ये शाळांची फी, बसची सुविधा यामुळे पालकांवर मोठा आर्थिक भार येतो. दुर्दैवाने, काही ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षक स्वतःच्या मुलांना या शाळांमध्ये न पाठवता इंग्लिश मीडियम शाळांमध्ये घालतात. अशा वर्तनामुळे पालकांमध्ये सरकारी शाळांबद्दलचा विश्वास कमी झाला आहे.

जर शासनाने शैक्षणिक धोरणांवर योग्य लक्ष केंद्रित केले, जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारला, तसेच शिक्षकांनी स्वतःच्या मुलांना या शाळांमध्ये पाठवले तर या शाळांवरील विश्वास वाढू शकतो. पालकांच्या आर्थिक भारात घट होईल आणि अशा अपघातांची संख्या कमी होईल.

सुरक्षिततेसाठी उपाययोजना आणि प्रशासनाची जबाबदारी
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा प्रशासनाने बसची नियमित देखभाल, योग्य चालकांची निवड आणि नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. शासनाने देखील अशा खासगी शाळांवर कडक निर्बंध घालून त्यांच्या सुविधांची तपासणी करण्यासाठी प्रभावी धोरणे राबवावी.

कु. महिमा सरकाटे हिच्या मृत्यूने अनेक प्रश्न ऐरणीवर आणले आहेत. पालकांच्या डोळ्यातील स्वप्न आणि हृदयातील आशा एका क्षणात उद्ध्वस्त झाली आहे. शासनाने अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना केल्यास पालकांना दिलासा मिळेल आणि त्यांच्या मुलांचे भविष्य अधिक सुरक्षित होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!