संपादकीय

आपला राम खरंच अयोध्येत आहे का!भारताची धर्म निरपेक्ष राष्ट्र म्हणून असलेली ओळख पुसली जाणार ?.

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

आपल्या भारताची ओळख ही संबध जगभर धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून आहे. असे असले तरी अलिकडील काही वर्षांपासून भारताची धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून असणारी ओळख काही लोक पुसण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न करतं आहेत. सार्वजनिक ठिकाणी राममय वातावरण तयार केले जातं आहे. आणि यांवरच सध्या काही राजकीय लोक निवडणूकीची पोळी भाजून घेत आहेत. जातिव्यवस्था अधिक वृध्दिंगत करण्याचा प्रयत्न सध्या संबंध देशांमध्ये सुरू आहे. धर्म,देव हा भावनिक मुद्दा असल्याने लोक त्याच्याशी अधिक लवकर जोडल्या जातात. तार्किक पध्दतीने या मुद्याकडे बघितले जात नाही. धर्मापुढे सामाजिक प्रश्न सध्या मागे पडताना दिसतात. सध्या देशात अनेक सामाजिक प्रश्न आहेत परंतु त्याकडे दुर्लक्ष करून लोकांना धर्मात अडकविण्याचा प्रयत्न सर्वत्र होत आहे. सध्या देशात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यां, महिला अत्याचार, निरक्षरता, युवकांच्या समस्या अशा असंख्य समस्यां असतांना लोकांना धर्मात गुरफटविण्याचे हे पध्दतशीर कार्यक्रम का आखले जातात हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. शिव,फुले, शाहू, आंबेडकर यांनी जातीअंताकडे वाटचाल सुरू केली होती. आणि आता सध्या देशाची वाटचाल ही जातिव्यवस्थेच्या सक्षमीकरणाकडे सुरू आहे आणि हेंच वास्तव आहे. हे दुर्दैवी आहे आणि हे थांबणे गरजेचे आहे. आमचा राम हा अयोध्येत आहे का ? हा प्रश्न हिंदू म्हणवून घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःला विचारला पाहिजे. संविधानाने सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहेच पण तो धर्म केवळ आपल्या घरापुरता असणे गरजेचे आहे. राजकीय भांडवल म्हणून धर्माकडे बघितले जाऊ नये. असे माझे ठाम मत आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. २०२४ निवडणुकांसाठी धर्माचा वापर केला जात आहे. परंतु निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था साधा हस्तक्षेपही करतं नाही. दोन शब्द या बाबत बोलायला तयार नाही. हे या लोकशाही प्रधान देशांची शोकांतिका म्हणावी लागेल. हे थांबविण्यासाठी निळे,भगवे,पिवळे, पांढरे झेंडे बाजुला सारुन तिरंग्याखाली एकत्र येणे महत्त्वाचे आहे. आमचा राम हा आमचे भविष्य वाचविण्यात आहे हे मात्र खरे.
आमचा राम हा आमच्या कामात आहे. काही काम न करता राम-राम करणे यात काही राम आहे असे मला वाटत नाही. आमचा राम हा आमच्या शिक्षणात आहे. आमचा राम आम्ही घाम गाळून पिकविलेल्या मालाला योग्य भाव मिळविण्यात आहे. आमचा राम हा शेतकरी आत्महत्या थांबवण्यात आहे. आमचा राम हा महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यात आहे‌. आमचा राम हा आमच्या रोजगारात आहे. आमचा राम हा दिवसा लाईट भेटल्यानंतर पिंकाना पाणी देण्यात आहे. आमचा राम हा आमच्या संविधानात आहे. आमचा राम लहान बहीण भावाच्या भविष्यात आहे आमचा राम हा शेतकऱ्यांचे शोषण थांबवण्यात आहे‌. आमचा राम देशावरील वाढणारे कर्ज कमी करुन विकास करण्यात आहे. आमचा राम शाळा उभारण्यात आहे. आमचा राम अभ्यासात आहे. आमचा राम आमच्या सत्य बोलण्यात आहे. आमचा राम हा आमच्या प्रामाणिक पणामध्ये काय माहीत अयोध्येतील राम हा केवळ निवडणुका आल्यावरच जागा होतो. सध्या देशात लोकशाहीच्या आडुन हुकुमशाही राजवट चालविली जात आहे. जो कोणी व्यवस्थेच्या विरुद्ध बोलेल त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. त्याला देशद्रोही ठरविल्या जात आहे. हे थांबविणे प्रत्येक विचारशील, परिवर्तनशिल व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे हे मात्र निश्चित. भारताची धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून असणारी ओळख जोपर्यंत परिवर्तनवादी विचारांचे लोक जीवंत आहेत तोपर्यंत तरी ही धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून भारताची ओळख पुसल्या जावूच शकत नाही. असे मला वाटते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!