महावितरणच्या अनागोंदी कारभाराविरोधात हिवरा परिसरातील नागरिकांचा महामार्गावर रास्ता रोको

(विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करून कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे)
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा फटका बसुन अनंतवाडी विज वितरण केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील त्रस्त झालेल्या नागरिक ,शेतकऱ्यांनी माजी जि.प.सदस्य साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.महावितरण अधिकाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करून कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
महागाव तालुक्यातील अनंतवाडी येथील वीज वितरण केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये मागील काही दिवसांपासुन गावठाण व कृषी( एजी) फिडर चा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे.या केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये एबी स्विच अस्तित्वातच नाहीत जर एखाद्या ठिकाणी साधा तांत्रिक बिघाड झाल्यास त्याकरिता तासोनतास संपुर्ण फिडर बंद ठेवण्याचा प्रकार सुरू आहे कृषी फिडर चा विद्युत पुरवठा मागील दोन महिन्यांपासुन बंद असल्याने अनेक गावांमधील पाणी पुरवठा योजना बंद आहे.पाण्या अभावी पिके करपुन जात आहे. त्यामुळे हिवरा(संगम) व परिसरातील सर्व गावातील त्रस्त झालेल्या शेतकरी व नागरिकांनी कृषी फिडरचा विद्युत पुरवठा तत्काळ सुरू करणे.त्याच प्रमाणे हिवरा येथे सेक्शन ऑफिस निर्माण करणे,तारांच्या ऐवजी वायर केबल टाकणे,

अनेक ग्राहकांकडून कोटेशन घेवुन मीटर दिले नाही त्यांना तत्काळ मीटर देणे,हिवरा येथे २ज्यादा डिपी देणे,विज वितरण केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये एबि स्विच बसविणे,सर्व डीपि वरील पेट्या बदलने, हिवरा येथील लाईनमनची तत्काळ बदली करणे, हिवरा गावठाण व कासारबेहळ गावठाण वेगळे करणे, हिवरा(संगम) येथील बाजार लाईन मधील डिपी नदीच्या पुराच्या पाण्यात येत असल्याने स्थलांतरित करणे,सर्व कृषी फिडर तत्काळ दुरुस्त करणे,आनंद नगर येथे ज्यादा डिपी देणे , इजनी येथे गावठाण फिडर वेगळे करून पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवर नवीन ट्रान्स फार्मर बसविणे, त्याच प्रमाणे हिवरा, ईजनी,थार,कासारबेहळ, अनंतवाडी,आनंदनगर ,वाकान , कोनदरी सह सर्व गावांच्या विजेच्या समस्या निकाली काढण्यात याव्यात या मागण्या घेवुन माजी जि. प. सदस्य साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वात हिवरा (संगम) येथील छत्रपती शिवराय चौकात राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल दोन एक तास रास्ता रोको आंदोलन सुरू होते. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता जनार्दन चव्हाण, सहाय्यक अभियंता गौर ,बाळू राठोड,उमेश शिंदे यांनी आंदोलकांची भेट घेवुन त्यांच्या मागण्या मान्य करून कामाला सुरुवात करून येत्या तीन दिवसात सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.यावेळी या आंदोलनात परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
या आंदोलनाला महामार्ग ठप्प होवुन वाहतूक बंद झाली होती.
रास्ता रोको आंदोलन दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे यांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता.