वाशिम- पोहरादेवी- दिग्रस- माहूर- आदिलाबाद आणि वाशिम- बडनेरा नवीन रेल्वे मार्ग मंजूर करा. – खा. संजय देशमुख दिनांक: 31 जानेवारी 2025

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना अधिक चांगल्या रेल्वे सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि या भागाचा दळणवळणाच्या दृष्टीने विकास होण्यासाठी खासदार संजय उत्तमराव देशमुख यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन महत्त्वाच्या रेल्वे मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यांनी मंत्री महोदयांशी सविस्तर चर्चा करत या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी विशेष आग्रह धरला.
नवीन रेल्वे मार्ग मंजूर करून तातडीने काम सुरू करावे!
१)वाशिम-पोहरादेवी-दिग्रस-माहूर-आदिलाबाद आणि वाशिम-बडनेरा हे रेल्वे मार्ग वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दोन्ही मार्गांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी तातडीने मंजुरी देऊन आवश्यक निधी (बजेट) मंजूर करावा, अशी मागणी खासदार संजय देशमुख यांनी केली आहे.
वर्धा-नांदेड महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला गती द्या!
वर्धा-नांदेड हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प संथ गतीने सुरू आहे. या प्रकल्पाला गती देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार संजय देशमुख यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्यासोबत चर्चा करून केली.
नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठी मागणी:
१. नांदेड-नागपूर व्हाया अकोला-वाशिम पॅसेंजर गाडी सुरू करावी.
२. नांदेड-हरिद्वार व्हाया वाशिम नवीन रेल्वे गाडी सुरू करावी.
- सूरत-भुसावळ एक्सप्रेस (क्रमांक 19006/07) वाशिमपर्यंत विस्तार करावा.
- तिरुपती-अकोला व्हाया वाशिम विशेष रेल्वे गाडी (क्रमांक 07606/07) शिरडीपर्यंत वाढवावी.
- नांदेड-पटना विशेष रेल्वे गाडी (क्रमांक 07615/16) स्थायी करण्यात यावी. या गाडीमुळे वाराणसी, प्रयागराज, अयोध्या, बुद्धगया आणि पटना यासारख्या धार्मिक स्थळांसाठी प्रवाशांना कायमस्वरूपी सुविधा मिळेल.
- नांदेड-कुर्ला रेल्वे गाडी (क्रमांक 17665/66 आणि 17667/68) तातडीने सुरू करावी. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने 29 ऑगस्ट 2023 रोजी नांदेड-कुर्ला व्हाया वाशिम-अकोला मार्गावर नवीन रेल्वे सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, दोन वर्षे उलटूनही ही गाडी सुरू झालेली नाही. त्यामुळे तातडीने कार्यवाही करून ही रेल्वे गाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी खासदार संजय देशमुख यांनी केली आहे.
खासदार संजय देशमुख यांचे मत:
“यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना उत्तम रेल्वे सुविधा मिळाव्यात, प्रवास अधिक सोयीस्कर आणि जलद व्हावा, तसेच धार्मिक व औद्योगिक स्थळांशी थेट जोडणी मिळावी, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. या सर्व रेल्वे मागण्या केवळ या भागाचा विकास साधण्यासाठीच नव्हे, तर येथील प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन आवश्यक निधी मंजूर करावा, अशी विनंती मी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांना केली आहे. येथील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होईपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील.”
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी रेल्वे सेवा सुधारण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची पावले उचलली जात असून, या मागण्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे.
वाशिम-पोहरादेवी-दिग्रस-माहूर-आदिलाबाद आणि वाशिम-बडनेरा हे प्रस्तावित रेल्वे मार्ग वाशिम जिल्ह्याच्या दळणवळणाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतील.
वाशिम ते पोहरादेवी-दिग्रस-माहूर-आदिलाबाद या मार्गांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, आता यासाठी तातडीने कार्यवाही करून आवश्यक निधी (बजेट) मंजूर करणे गरजेचे आहे. खासदार संजय देशमुख यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे या मार्गांच्या जलद विकासासाठी मंजुरी मिळविण्यासाठी विशेष आग्रह केला आहे.
वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर ही धार्मिक स्थळे प्रचंड महत्त्वाची आहेत. पोहरादेवी हे बंजारा समाजाचे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक स्थान आहे, जिथे तेलंगणा, आंध्र प्रदेशातून लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी येतात. त्यामुळे या मार्गाच्या माध्यमातून त्या भाविकांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण रेल्वे जोडणी निर्माण होईल. याशिवाय, माहूर हे महाराष्ट्रातील साडेतीन पिठांपैकी एक पिठ आहे आणि महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान आहे. ह्या कारणामुळे, पोहरादेवी ते माहूर या मार्गावर रेल्वे सुविधा सुरू केल्यास या पवित्र स्थळांशी जोडणी होईल आणि भाविकांना सुकरपणे दर्शन घेता येईल.
याशिवाय, वाशिम ते बडनेरा हा मार्गही महत्वाचा आहे. बडनेरा,अमरावती कडे नवा उद्योगधंदा व व्यापाराचा मार्ग खुला होईल, वाशिम जिल्ह्याचा व्यापारी विकास होईल, आणि या मार्गामुळे इतर महत्त्वाचे शहर व राज्यांशी रेल्वे जोडणी होईल.
हे दोन्ही मार्ग पूर्ण झाल्यास वाशिमला एक महत्वाचे रेल्वे जंक्शन म्हणून ओळख मिळेल. वाशिम जिल्ह्याला असलेल्या “आकांक्षी जिल्हा” म्हणून ओळख पुसून, त्याला एक नव्या प्रकारची ओळख मिळेल. या मार्गांच्या विकासामुळे वाशिम शहराचा दळणवळणाचे केंद्र म्हणून विकास होईल आणि जिल्ह्यातील औद्योगिक व व्यापार क्षेत्रालाही चालना मिळेल. वाशिम शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना अत्यंत सोयीस्कर, जलद आणि सुरक्षित रेल्वे सेवा मिळेल, ज्यामुळे प्रवासाची सोय वाढेल आणि व्यापारी व पर्यटन क्षेत्राला देखील मोठा फायदा होईल.
सर्वसाधारणपणे, या रेल्वे मार्गांच्या विकासामुळे वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण भागाचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास होईल. स्थानिक उद्योगांना चालना मिळेल, शहरीकरण आणि औद्योगिकीकरण वाढेल आणि ग्रामीण भागाच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची प्रगती ठरेल.
यासाठी तातडीने कार्यवाही करून मंजुरी देणे आणि आवश्यक निधी (बजेट) मंजूर करणे अत्यंत आवश्यक आहे. खासदार संजय देशमुख यांचे या प्रस्तावाबाबत लक्ष केंद्रित करत त्यांच्याकडून या प्रकल्पांची लवकरात लवकर अंमलबजावणी होईल, अशी आशा आहे