लोकसहभागाचे महत्व नागापूर या गावाने दाखवून दिले- पालकमंत्री संजय राठोड नागापूर ग्रामपंचायत भवनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन नागापूर गावाच्या विकासासाठी 51 लाखाचा निधी

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
यवतमाळ, दि.1 (जिमाका) : कोणत्याही गावाच्या विकासात लोकसहभाग फार महत्वाचा आहे. लोकसहभाग आणि गावकऱ्यांच्या एकजूटीने गावाचे चित्र कसे पालटू शकते, हे नागापूर या गावाने दाखवून दिले आहे. या गावाने आदर्शवत काम केले असून इतर गावांनी देखील असे काम करावे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
उमरखेड तालुक्यातील नागापूर येथील राजीव गांधी ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पन व स्मार्ट ग्रामपंचायत कार्यालयाचे स्थलांतरण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आ.किसन वानखेडे, हादगावचे आ.बापुराव कदम, माजी आमदार विजय खडसे, सरपंच गोदाजी जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कालींदा पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीधर मोहोड, चितांगराव कदम, नितीन भुतडा, हरिहर लिंगनवार, पराग पिंगळे, डॉ अंकुश देवसरकर आदी उपस्थित होते.

नागापूर येथील व्यायामशाळा, गांडूळखत निर्मिती प्रकल्प, पाणी व्यवस्थापन, आदर्श शाळा, सौरऊर्जा, सभागृह, स्वच्छता या सर्वच गोष्टी अद्भूत आहे. चितांगराव कदम यांनी वेगळी संकल्पना राबवून लोकसहभागातून गावाचा कायापालट केला आहे. शासकीय इमारती काही काळानंतर अडगळीत पडतात, तेथील साहित्य सापडत नाही. परंतू येथे काही वर्षापूर्वी झालेली कामे, त्यातील वस्तू अजूनही सुस्थितीत असल्याचे पाहून नवल वाटले, असे पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले.
शासनाने वेगवेगळ्या घटकांसाठी अनेक प्रकारच्या योजना आणल्या आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी अशा योजनांचा समावेश आहे. जलसंधारण विभागाच्यावतीने आदर्श गाव ही संकल्पना राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर ‘माझं गाव, लाडकं गाव, किंवा ‘माझं गाव तीर्थक्षेत्र’ ही संकल्पना राबविता येईल का यासाठी प्रयत्न करू. याकरीता चितांगराव कदम यांचे मार्गदर्शन घेऊ. गावातच रोजगार निर्माण झाले पाहिजे, यासाठी शासन प्रयत्न करत आहे. ग्रामस्तरावर सुरु होऊ शकणाऱ्या उद्योगांची यादी आम्ही तयार केली आहे. लवकरच या उपक्रमास सुरुवात होणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

नागापूर लोकसहभागातून साकारलेले अतिशय सुंदर आणि उपक्रमशील गाव आहे. या गावाच्या उर्वरीत विकास किमांसाठी 51 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. गावाच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यक्ता असेल ते उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. कम्पाऊंड, सभागृह, कबड्डी मॅटसाठी देखील निधी उपलब्ध करून देऊ, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी आ.किसन वानखेडे व आ.बापुराव कदम यांनी देखील मनोगत व्यक्त केले. लोकसहभागामुळेच अतिशय सुंदर अशी ग्रामपंचायती ईमारत उभी राहू शकली. गावाने केलेले लोकसहभागाची कामे अतिशय आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चितांगराव कदम यांनी केले. कार्यक्रमास गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसहभागातील बंधारा कम रस्त्याची पाहणी
पळशी येथे चितांगराव कदम यांनी लोकसहभागातून बांधलेल्या बंधारा कम रस्त्याची पाहणी पालकमंत्री संजय राठोड यांनी केली. हा बंधारा अधिक चांगला करण्यासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ तसेच बंधाऱ्यापासून मंदीरापर्यत जाणाऱ्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे पाहणीप्रसंगी पालकमंत्री म्हणाले.