आशा बालसिंग बस्सी अशोका विद्यापीठात शिकणार

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
मथुरा लभान समुदायातील पहिलीच विद्यार्थ्यांनी
सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ येथे सध्या समाजकार्य स्नातक पदवीच्या अंतिम वर्षाला शिकत असलेली आशा विमल बालसिंग बस्सी ही थेट आता अशोका विद्यापीठात शिकायला जाणार आहे. नुकतीच तिची निवड प्रक्रिया पार पडली. Young India Fellowship या एकवर्षीय अभ्यासक्रमासाठी तिची निवड झाली आहे. त्यानिमित्ताने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारतातील प्रतिशिष्ट अशा अशोका विद्यापीठात आशा ची Young India Fellowship या अभ्यासक्रमासाठी 100% शिष्यवृत्ती सह निवड झाली आहे.
ज्यात एकूण 10 लाख रुपयांचा खर्च विद्यापीठ उचलणार आहे.
यासोबतच अझीम प्रेमजी विद्यापीठ, बंगलोर याठिकाणी देखील MA Development साठी निवड झाली आहे.
आशा या सर्व यशाचे आई – वडील मामा -मामी आणि शिक्षकांना देतं आहे. आशा म्हणते की, माझ्या बरोबर शिक्षण घेणाऱ्या कित्येक विद्यार्थ्यींनीचे लग्न झाले आहे. मला त्यांच्यात मिसळायचे नाही असे ठरवले आणि मला शिकायचंच अशी खुणगाठ मी स्वतःशी बांधली आणि शैक्षणिक प्रवासाला सुरुवात केली. शिक्षण घेतांना अनेक अडचणी आल्या. कुटुंबाशी संघर्षही करावा लागला परंतु आज या यशामुळे सर्व कुटुंब आनंदी आहे. आशा ही उमरखेड तालुक्यातील जेवली या गावची मुळ रहिवासी. प्राथमिक शिक्षण पुर्ण करुन ती पुढील शिक्षणासाठी यवतमाळ येथे मामाच्या घरी शिकायला आली मामाने तिला शिक्षणासाठी हवी ती मदत केली. मामा हे पेशाने शिक्षक असल्याने त्यांना शिक्षणाचे महत्त्व माहीत होतं. म्हणुनच आशाच्या पंखा मध्ये बळ भरण्याच काम मामा अर्जुन साबळे आणि मामी अर्चना साबळे हे देखील तिच्या संघर्षात वाटेकरी झाले. विज्ञान शाखेतुन बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ येथे समाजकार्य स्नातक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवला तिथेही तिला शिक्षणास पोषक वातावरण मिळाले. तिच्या सोबत खंबीर पणे उभे राहिले ते प्रा.घनशाम दरणे. आशा म्हणते आज मी जे काही आहे. ते दरणे सरांमुळे आहे. महाविद्यालयाचे दिवंगत प्राचार्य डॉ अविनाश शिर्के यांच्या मुळे अशोका विद्यापीठात शिकण्याची प्रखर इच्छा तिच्या मनात निर्माण झाली होती. या सर्व प्रवासात ती एकली होती असे नाही. तिला वेळोवेळी एकलव्य इंडिया फाउंडेशन ने मदत केली. त्यामध्ये राजू केंद्रे, प्रशांत चव्हाण स्मिता ताटेवार व अक्षय शेळके याचं ती वेळोवेळी मार्गदर्शन घ्यायची. या सगळया selection process मध्ये एकलव्य इंडिया फाउंडेशन चे गोविंद मोरे यांनी मार्गदर्शकाची भुमिका बजावली,ते वेळोवेळी आढावा घेत असत.आशाची निवड अशोका विद्यापीठात झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण शेंडे यांनी तिचे कौतुक केले आहे.