संस्था चालकाला अटक करण्यासाठी पालकांचे ठिय्या आंदोलन 24 तासात अध्यक्षाला पकडण्याचे पोलिसांचे आश्वासन स्कूल बस अपघात प्रकरण

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड :- दिनांक 25 जानेवारी रोजी शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूलबस अपघातात एका निष्पाप मुलीला आपला जीव गमवावा लागला. यासाठी जबाबदार असणाऱ्या बस चालक मुख्याध्यापक व संस्था अध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे पण आजपर्यंत ही मुख्याध्यापकाला व अध्यक्षाला पोलिसांनी अटक केली नाही त्यामुळे सदर घटनेस जबाबदार असणाऱ्या सर्वांना त्वरित अटक करा. या मागणीसाठी दिनांक 29 रोजी पालकांनी शाळेजवळ ठिय्या आंदोलन देऊन पोलिसांना धारेवर धरले होते.
अनेक वेळा पालकांनी तक्रारी करून सुद्धा सदर स्कूलबस चे मेंटेनन्स शाळा प्रशासनाने केले नाही. त्यामुळेच 25 जानेवारी रोजी सदर स्कूल बसचा अपघात झाला. सदर वाहनाचे कोणतेही स्कूलबस चे प्रमाणपत्र किंवा फिटनेस प्रमाणपत्र , इन्शुरन्स, पीयुसी प्रमाणपत्र , परवाना आढळून आला नाही. शाळा प्रशासनाकडून अशा नियमाबाह्य वाहनाचा वापर करून विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालण्याचा प्रकार शालेय व्यवस्थापन समिती व चालकाकडून झाला आहे. त्यामुळे संस्थेच्या सर्व संचालका विरुद्ध व शाळा प्रशासनाविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना त्वरित अटक करण्यात यावी या मागणीसाठी दिवटपिंपरी, कळमुला, पोफाळी , पळशी जनूना या गावातील पालकांनी शाळेच्या गेटवर ठिया आंदोलन केले.
संस्था अध्यक्ष दर्शन अग्रवाल व मुख्याध्यापक माधव कदम यांच्यावर पोलिसांनी दिनांक 25 रोजी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पण दोघांच्याही अटकेसाठी पोलीस करत असलेल्या दिरंगाईबाबत पालकांनी चांगलेच धारेवर धरले. दरम्यान या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड यांनी शाळेच्या तपासणी बाबत आपण वरिष्ठांना अहवाल सादर केलेले आहेत असे सांगितले पण वाहनाचे कोणतेही कागदपत्र उपलब्ध झाले नाही असे त्यांनी पालकांना स्पष्टीकरण दिले . सुरुवातीला पोलिसांनी पालकांना समजाविण्याचा प्रयत्न केला होता पण पालकांच्या आंदोलनासमोर तो फोल ठरला त्यामुळे पोफाळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे यांनी दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत संस्था अध्यक्ष दर्शन अग्रवाल व मुख्याध्यापक माधव कदम यांना अटक करण्यात येईल असे पालकांना आश्वासन दिल्यामुळे पालकांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले पण अटक न झाल्यास पुन्हा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशी ही कठोर भूमिका पालकांनी यावेळी मांडली.