पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासा – कृषीदूतांचे शेतकऱ्यांना आवाहन

शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192
उमरखेड, ता. (जून)
उमरखेड येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांनी तालुक्यातील कळमुळा गावात प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमातून शेतकऱ्यांना योग्य बियाण्यांची निवड, उत्पादनात वाढ आणि अनावश्यक खर्च टाळण्याबाबत उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले.
कृषीदूतांनी स्पष्ट केले की, उगवण क्षमतेची चाचणी योग्य वेळेत केल्यास पीक सम प्रमाणात उगम पावते, परिणामी उत्पादनात वाढ होते. यामुळे पुन्हा पेरणी करावी लागण्याची वेळ येत नाही आणि वेळ व आर्थिक खर्च वाचतो. विशेषतः जुन्या साठवणीतील बियाण्यांची उगमशक्ती कमी झालेली असण्याची शक्यता असते, त्यामुळे पेरणीपूर्वी चाचणी करणे अत्यावश्यक आहे.तालुक्यातील प्रमुख पिक असलेल्या सोयाबीनसाठी दर्जेदार व प्रमाणित बियाण्यांची निवड अत्यंत गरजेची आहे. कृषीदूतांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले की, बियाणे नवे असो वा साठवणीतील, पेरणीपूर्वी किमान १०० बियाण्यांची उगवण चाचणी करून त्याची टक्केवारी तपासावी. ७५ टक्क्यांहून अधिक उगवण क्षमता असलेले बियाणेच वापरणे फायदेशीर ठरते.कृषीदूत राजेश्वर पायघन, कृष्णा सरनाईक, अक्षय तारे, शुभम नांगरे, अनिकेत ठाकरे आणि ओंकार ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शंका समजून घेतल्या आणि त्यावर उपाय सुचवले. बियाण्यांची उगवण क्षमता कशी तपासावी याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
मान्सूनच्या आगमनामुळे तालुक्यातील शेतकरी सध्या पेरणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे योग्य नियोजन व बियाण्यांची चाचणी करूनच पेरणी करावी, असे कृषीदुतांनी स्पष्ट केले.
या उपक्रमात कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. चिंतले, ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी ए. बी. इंगळे, तसेच वाय. एस. वाकोडे, ए. एस. राऊत आणि विषयतज्ज्ञ डॉ. एस. बी. मातीखाये यांचे मार्गदर्शन कृषीदुतांना लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत तांत्रिक माहिती प्रभावीपणे पोहोचवता आली.
शेवटी, कृषीदुतांनी घेतलेला हा उपक्रम इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असे उपस्थितांनी मत व्यक्त केले. पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासल्यास उत्पन्नात वाढ होऊन उत्पादन खर्चात बचत होईल, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.