Uncategorized

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षांची गावंडे महाविद्यालयास भेट

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798606192

उमरखेड (दि. ३० ऑगस्ट)
कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य, राज्यमंत्री दर्जाचे अध्यक्ष ॲड. निलेश केशवराव हेलोंडे पाटील यांनी नुकतीच येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयास भेट दिली आणि शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी ग्रंथालयातील पुस्तके व अभ्यासिका उपलब्ध करून देण्याबाबत प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांच्याशी चर्चा केली.
शेतकऱ्यांचे पाल्य आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र संपल्यानंतर रोजगार मिळवण्यासाठी त्यांना विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. स्पर्धा परीक्षांना सामोरे जात असताना त्यांना स्पर्धा परीक्षेबाबत फारशी माहिती नसते. तसेच त्यांच्याकडे स्पर्धा परीक्षेची पुस्तके, वर्तमानपत्रे, नियतकालिके इ. खरेदी करण्याची क्षमता नसते. पर्यायाने अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे पाठ फिरवतात.
आपल्या पाल्यांना शिकवण्याची क्षमता नसल्याने या विद्यार्थ्यांचे पालक कर्जबाजारी होऊन हताश होऊन शेवटी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. शेतकरी आत्महत्यांमागे हेही एक कारण आहे. अशा विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य, अमरावती यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सहकार्याने एक नावीन्यपूर्ण आणि सकारात्मक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यातील एका महाविद्यालयाचे ग्रंथालय व अभ्यासिकेचा उपयोग त्या तालुक्यातील सर्व विद्यार्थी घेतील.

या उपक्रमाला सुरुवात करण्यासाठी व चालना देण्यासाठी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य, राज्यमंत्री दर्जाचे अध्यक्ष ॲड. निलेश केशवराव हेलोंडे पाटील यांनी महाविद्यालयास भेट देऊन ग्रंथालयाची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले. याप्रसंगी यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चितांगराव कदम, उमरखेडचे तहसीलदार सुरडकर, उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. पी‌. कदम, प्रो. डॉ. डी. व्ही. तायडे हेही उपस्थित होते. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांनी ग्रंथालयासाठी आणखी स्पर्धात्मक परीक्षांची पुस्तके पाहिजे, ती तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध झाली तर तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना या पुस्तकांचा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. या उपक्रमाच्या अंमलबजावणीनंतर तालुक्यातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील स्पर्धा परीक्षांची पुस्तके आणि अभ्यासिकेचा फायदा होईल,
अशी माहिती त्यांनी दिली. यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गाव तिथे अधिकारी’ हा उपक्रम सुरू आहे. संस्थेच्यावतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकाही सुरू झाल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!