बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या कंपन्यावर गुन्हे दाखल करा

( सामाजिक कार्यकर्ते किशोर भवरे यांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन )
शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड :- पावसाळ्याची चाहूल लागल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी धावपळ चालू आहे अशातच बियाण्यांची कृत्रिम टंचाई करून ज्यादा भावाने बियाणे व खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा कंपन्याचा डाव असून असे करणाऱ्या कंपन्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी काँग्रेसचे सामाजिक कार्यकर्ते किशोर भवरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे .
उमरखेड येथे आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आले असता किशोर भवरे यांनी त्यांची भेट घेऊन सदर निवेदन दिले.
अस्मानी व सुलतानी संकटाशी झुजत असलेला शेतकरी वर्ग सध्या अडचणीत असून शेतीचा उत्पादन खर्च वाढत चाललेला असताना कापूस व सोयाबीनला भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडत नाही शेतीच्या मशागती पासून ते उत्पन्न पर्यंत लागणारा खर्च पाहता शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडत नाही अशी अवस्था आहे . एकीकडे बियाणे आणि खताचे भाव वाढत असताना शेतमालाचे भाव मात्र जैसे थे आहे त्यामुळे खताचे व बियाण्याचे भाव कमी करण्यासंदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करावा अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे .
यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम व जंगलव्याप्त असलेल्या उमरखेड तालुक्यात वन्य प्राण्यांमुळे शेतीचे भरमसाठ नुकसान होत असते परंतु झालेले नुकसानाची भरपाई मात्र शेतकऱ्याला भेटत नाही त्यामुळे ती तात्काळ देण्यात यावी , उमरखेड व महागाव तालुक्यात शेतीवर आधारित उद्योग एमआयडीसी मध्ये उभे राहिले पाहिजे जेणेकरून शेतकरी मुलांचे होत असलेले स्थलांतर हे रोखता येऊ शकते यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे .मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई काही प्रमाणात का असेना पण शेतकऱ्यांना मिळाली परंतु रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही ती त्वरित देण्यात यावी . तसेच शेतकऱ्यांच्या मुलांचा बेरोजगारीचा व मजुरांचा कामाचा प्रश्न उमरखेड व महागाव तालुक्यात ऐरणीवर असून यामुळे शेतकऱ्यांची मुले व मजुरांचे स्थलांतर होत आहे ते थांबवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी सुद्धा किशोर भवरे यांनी निवेदनातून केली आहे .