Uncategorized
संतकवी विष्णुदासांच्या काव्याचा प्रचार, प्रसार वैदर्भीयांनी केला डॉ. मार्तंड कुलकर्णी

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड:- "संत कवी विष्णुदासांची कविता ही मातृभक्तीने चिंब भिजलेली असून ती बहुआयामी स्वरूपाची आहे. त्यांच्या एकूणच काव्यरचनेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य विदर्भातील लेखक, समीक्षक व शिष्य परिवारांनी मोठ्या प्रमाणात केले, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व लोकसाहित्य समिती,मुंबईचे सदस्य, संत साहित्याचे अभ्यासक, किनवटच्या सरस्वती महाविद्यालयातील मराठीचे प्रोफेसर डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी केले.
श्री उत्तमश्लोक वाङ्मय मंडळ व वाचनालयाच्यावतीने संतकवी श्री उत्तमश्लोक महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कै. नागोराव एकबोटे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य राम देवसरकर होते. उत्तमश्लोक वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष अरविंद पांडे व्यासपीठावर उपस्थित होते. उत्तम श्लोक वाङ्मय मंडळाचे हे शतक महोत्सवी वर्ष आहे. मागील शंभर वर्षांपासून मंडळामार्फत अनेक उपक्रम राबवले जातात. कार्यक्रमाचे अध्यक्ष राम देवसरकर यांचा परिचय प्रा. अभय जोशी यांनी तर मार्तंड कुलकर्णी यांचा परिचय प्रशांत पांडे यांनी करून दिला.
आपल्या अध्यक्षीय समारोपातून राम देवसरकर यांनी या अनुषंगाने अशा बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने झाले पाहिजे. संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त उद्बोधनातून विद्यार्थ्यांसमोर अशा विषयांची मांडणी झाली तर सुसंस्कृत समाज निर्माण करता येईल. तरुण पिढीवर असे संस्कार केले तर ही पिढी न बिघडता तरुणांकडून समाजोपयोगी विधायक कार्य घडेल, या विचारांवर भर दिला. श्रद्धेय ॲड. अनंतरावजी देवसरकर यांचा या परिसराशी असलेल्या ऋणानुबंधाचाही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. उत्तमश्लोक वाङ्मय मंडळ व वाचनालयाच्या मदतीसाठी मी माझा वाटा द्यायला तयार आहे. आम्ही यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेच्या माध्यमातून विविध गावांमध्ये स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारल्या आहेत. आता नवी अभ्यासिका उत्तमश्लोक वाङ्मय मंडळाच्या वाचनालयात उभी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत पांडे यांनी केले तर भारत कुळकर्णी यांनी आभार मानले. भाऊ मुनी, भारत कुळकर्णी, सविता पांडे, पराग देशपांडे, मुकुंद चुरमुरकर, अंजली एकबोटे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.