संस्कार पोदार लर्न स्कूल उमरखेड येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संस्कारदीपिका विद्यार्थी विशेषांक ठरला विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा झळाळता दीप”

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
“विद्यार्थ्यांनी दाखवलेली सृजनशीलता आणि भाषेवरील निष्ठा पाहून मन भारावून गेले. मराठी भाषा केवळ संवादाचे साधन नसून ती आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे.” – मा. सचिन निलपवार
उमरखेड : संस्कार पोदार लर्न स्कूलमध्ये २७ फेब्रवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ सृजनशीलतेच्या प्रकाशात आणि उत्साहाच्या रंगतदार वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या भाषिक आणि साहित्यिक क्षमतांना चालना देणाऱ्या वक्तृत्व, कथाकथन, काव्यसादरीकरण आणि हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षीस वितरण, ‘संस्कारदीपिका – विद्यार्थी विशेषांक २०२४-२५’ या विशेष साहित्य प्रकाशन सोहळ्याने या दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मा. सचिन रमेशराव निलपवार, केंद्रप्रमुख विडूळ, संस्थेचे संचालक अजय क्षीरसागर, शाळेचे प्राचार्य डॉ. भैरोबा मुंजाळ, प्रशासकीय अधिकारी अतिश दिघेवार, समन्वयक निखिल तुकदेव आणि ज्योती सुंदर मराठी विभाग प्रमुख शुभम चांभारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व महान कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पुजन आणि दीपप्रज्वलनाने झाली.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘ही माय मराठी आमुची’ या गीताने वातावरण प्रसन्न झाले.
स्वतःच्या हस्ताक्षरात ‘शिवलीलामृत’ हा ग्रंथ लिहून विद्यार्थ्यांसमोर वेगळा आदर्श निर्माण करणारे सुरेंद्रनाथ दळवी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘संस्कारदीपिका – विद्यार्थी विशेषांक २०२४-२५’ या विशेष साहित्य प्रकाशनाचे अनावरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या लेखणीतून उमटलेले सृजनशील विचार, आशयगर्भ कथा, भावपूर्ण कविता, हृदयस्पर्शी चारोळ्या आणि प्रेरणादायी लेख या अंकात समाविष्ट करण्यात आले. शाळेच्या वतीने प्रकाशित हा विशेषांक विद्यार्थ्यांच्या साहित्यिक क्षमतांचा एक मौल्यवान ठेवा ठरणार आहे.
विद्यार्थ्यांनी हस्ताक्षर, वक्तृत्व, कथाकथन आणि काव्यसादरीकरण या स्पर्धांमध्ये अतिशय उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. काव्यसादरीकरण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी प्रभावी अभिवाचन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषाशैली आणि विचारप्रवाह सादर करत आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मेहनतीचे चीज झाल्याचा आनंद स्पष्टपणे झळकत होता.
“विद्यार्थ्यांनी दाखवलेली सृजनशीलता आणि भाषेवरील निष्ठा पाहून मन भारावून गेले. मराठी भाषा केवळ संवादाचे साधन नसून ती आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीमध्ये साहित्यप्रेम रुजत आहे.” असे मत मा. सचिन निलपवार यांनी व्यक्त केले.
संस्थेचे संचालक अजय क्षीरसागर म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या सर्जनशील क्षमतांचा विकास व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. भविष्यातही असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवले जातील.”
शाळेचे प्राचार्य डॉ. भैरोबा मुंजाळ म्हणाले, “विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या उत्साहाचा आणि कलेवरील प्रेमाचा आम्हाला अभिमान आहे. हा उपक्रम केवळ स्पर्धापुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांनी आपल्या लेखणीला आणि विचारांना सतत विकसित करावे.”
शाळेचे संचालक राजेश देशमुख, अजय क्षीरसागर, निशांत बयास, धीरज बागडे, प्राचार्य भैरोबा मुंजाळ, प्रशासकीय अधिकारी अतिश दिघेवार, समन्वयक निखिल तुकदेव आणि जोती सुंदर यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.
सुत्रसंचालन प्राजक्ता मुंगे व संगमेश्वरी इप्पर, आभार स्नेहा शिंगणकर तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठी विभाग प्रमुख शुभम चांभारे, संतोष मोकळे, मंजुषा वानखेडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करत मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी असे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सृजनशीलता आणि भाषिक कौशल्यांना चालना देणारा हा उपक्रम पुढील वर्षी अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.