रस्ता रुंदीकरणासाठी तोडलेल्या वृक्षांची पाच वर्षानंतरही लागवड नाही

पाचपट वृक्ष लागवड कधी ? दंडात्मक कारवाईची आवश्यकता
शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड :तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर- तुळजापूर तसेच माहुर औरंगाबाद- कोपरगाव या दोन्ही वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम पाच वर्षांत शेवटच्या टप्प्यात आहेत. हे काम करताना मोठे वृक्ष जसे वड, पिंपळ, लिंब, आंबा, चिंच असे हजारो वृक्ष तोडले गेले ते परत पाचपट वृक्ष लागवड करण्याच्या अटीखाली, मात्र आता पाच वर्षाचा कालावधी लोटला तरी या रस्त्यावर कुठे झाडे लावल्याचे पहायला मिळत नाही. त्यामुळे झाडे तोडल्यानंतर या गोष्टीचा संबंधित रस्ता कंपन्यांना विसर पडलाच पण शासनाने याकडे डोळेझाक केल्याने वृक्षप्रेमी नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
दळणवळणासाठी रस्ते रुंदीकरण जेवढे आवश्यक आहे. तेवढेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे जतन करणे गरजेचे आहे. यामुळेच की काय उशिरा का होईना शासनाने वृक्ष संवर्धन केले जाईल या उद्देशाने झाडे तोडल्यास नुकताच एक हजार रुपयांवरून पन्नास हजारांचा दंड, कारावास जाहीर केला मात्र अजूनही अनेक ठिकाणी बेसुमार वृक्षतोड सुरूच असल्याचे आणि त्याला वनविभागाची डोळेझाक कारणीभूत असल्याचे पाहायला मिळते. ठिकठिकाणीच्या अनेक लाकडी मशीन बिनधास्तपणे परवानगी असलेल्या झाडांच्या नावाखाली इतर झाडांची तोड करीत मोठ्या प्रमाणात लाकूड व्यवसाय थाटून आहेत. सात वर्षांपूर्वी उमरखेड ते नांदेड व यवतमाळ या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हिरवाईने नटलेल्या झाडांच्या दुतर्फात आल्हाददायक प्रवासाची अनुभूती मिळायची. मात्र नंतरच्या काळात रेंगाळत झालेले रस्त्याचे काम अजूनही पूर्णतः पूर्ण झाले नाही. अजून बहुतांश ठिकाणी नाल्या राहिल्या तर काही ठिकाणी रस्ता भेगाळल्याचे चित्र आहे आहे.
चौकट
शासनाने दंडात्मक कार्यवाही करणे गरजेचे
वनक्षेत्र व हरितक्षेत्र वाढविण्यासाठी शासनाकडून झाडे लावा, झाडे जगवा
म्हणत कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात येतो मात्र वृक्षलागवड
कागदोपत्रीच दिसून येते. निसर्गाचा हास थांबविण्यासाठी वृक्षतोडीला
पुर्ण विराम मिळावा. जिल्हयातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या
कामाच्या वेळी तोडलेल्या आणि त्यांच्या जागी पाचपट झाडे लावण्याच्या
अटी न पाळणाऱ्या संबंधित बांधकाम कंपन्यांवर शासनाने दंडात्मक
कार्यवाही करणे गरजेचे आहे.