उमरखेड – पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आर्थिक भुर्दड

उमरखेड : उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवासीसंख्येतील वाढीचा गैरफायदा घेत उमरखेड-पुणे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी प्रवासदरात अवास्तव वाढ केली आहे. उमरखेड येथून पुण्यासाठी अनेक ट्रॅव्हल्स धावतात. १२ तासांच्या प्रवासासाठी वातानुकूलित गाड्यांचे दर तब्बल १३०० ते १६०० रुपये आहेत, तर विना एसी गाड्यांचे दर त्यापेक्षा फक्त १०० रुपये कमी आहेत. यावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने प्रवाशांवर आर्थिक भुर्दंड बसत आहे. शिक्षण, वैद्यकीय गरजांमुळे किंवा कौटुंबिक कारणास्तव प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना या दरवाढीमुळे आर्थिक फटका बसत आहे. पुण्यावरून परतीच्या प्रवासाचे दर मात्र ३०० ते ४०० रुपयांनी कमी असतात.यावरून कंपन्यांकडून एकाच मागीसाठी वेगवेगळ्या दराने लूट सुरू असल्याचे दिसून येते. सणासुदीच्या काळात हेच प्रवाशांकडून २५०० ते ३००० रुपये दरम्यान प्रवास दर वसूल करतात. ही दरवाढ कोणत्याही शासकीय नियमावलीविना, केवळ मागणी जास्त आणि जागा कमी या तत्त्वावर आधारित असल्याने ही सरळसरळ ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आरोप आहे. परिवहन विभागाने नियमित तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.