शकुंतला एक्सप्रेस’ पुन्हा धावणार!’खासदार संजय देशमुख यांची रेल्वे बोर्ड चे चेअरमन यांच्या भेटीत चर्चा

‘
प्रतिनिधी संजय नागरगोजे
दि.३ जुन रोजी रेल भवन, येथे रेल्वे बोर्डाचे चेअरमन श्री. सतीश कुमार जी यांची भेट घेतली. यावेळेस मतदारसंघातील दीर्घकालीन प्रलंबित रेल्वे प्रकल्पांबाबत चर्चा केली.
मुर्तिजापूर–कारंजा–दारव्हा या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठीची माझी सातत्याने मागणी होती. या मार्गाचे DPR देखील बनवायचे काम सुरू करून घेतले. या सुरू असलेल्या DPR (Detailed Project Report) बद्दल यावेळेस चर्चा केली. हा DPR अंतिम टप्प्यात आला असून, पूर्ण होताच तांत्रिक मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. या मार्गावर एकेकाळी चालणारी ‘शकुंतला एक्सप्रेस’ पुन्हा धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
ट्रेन क्र. 17665/66 आणि 17667/68 (नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस) ही रेल्वे वाशिम मार्गे मुंबईसाठी मंजूर असूनही अद्याप सुरू झालेली नाही. ही ट्रेन तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली होती काल झालेल्या बैठकीत रेल्वे बोर्डाचे चेअरमन श्री.सतीश कुमार जी यांनी ही ट्रेन लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
आता वाशिम जिल्ह्याला प्रथमच मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे मिळणार आहे, वाशिम जिल्ह्यातील जनतेचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
तसेच यावेळी वर्धा–नांदेड या रेल्वे मार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याची गंभीर बाब चेअरमन यांच्या निदर्शनास आणून दिली. हा लोहमार्ग यवतमाळ जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे त्याच्या कामास गती देणे आवश्यक आहे, अशी मागणी केली. रेल्वे बोर्डाने या मार्गाचे सघन निरीक्षण करून काम वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी, अशी विनंती केली.
“वाशिम जिल्ह्यातून मुंबईला जाण्यासाठी रेल्वे सुविधा ही गेल्या कित्येक वर्षांची मागणी आहे. ती आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहे. मी वाशिमवरून मुंबईसाठी ट्रेन आणणार म्हणजे आणणार आहे. तसेच वर्धा-नांदेड हा रेल्वे मार्ग जलद गतीने सुरू करण्यासाठी पाठपुरावा करत असून याला वेळेत पूर्णत्वास घेऊन जाणार आहे. तसेच मुर्तिजापूर–कारंजा–दारव्हा या ब्रॉडगेज प्रकल्पाला मंजुरी मिळेपर्यंत मी सातत्याने पाठपुरावा करणारच. हे तिन्ही प्रश्न माझ्या मतदारसंघाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहेत, आणि हे काम पूर्ण होईपर्यंत मी थांबणार नाही.”