नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या गैरकारभाराची चौकशी करून बदली करावी !

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड : येथील न. प. मध्ये मागील तीन वर्षापासून मुख्याधिकारी कारभार पाहतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नसल्यामुळे मुख्याधिकारी हे काही विशिष्ट लोकांच्या सांगण्यावरून काम करतात त्यामुळे त्यांच्या गैरकारभाराची चौकशी करून त्यांची बदली करण्यात यावी यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पालकमंत्री संजय राठोड यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन ११ फेब्रुवारी रोजी दिले आहे.
शहरासाठी नगररचना विभागांतर्गत नगर उत्थान निधीतून ३८ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे सदरचा निधी हा वस्तीमधील रस्ते व पाण्याचे व्यवस्थापन होण्याकरिता आहे. मात्र, मुख्याधिकारी यांनी सदरचा निधी सर्वे नंबर ३४० / १ पै. या जमिनीची सुधारणा करण्यासाठी वापरला आहे. नगरपरिषदकडून सदर जमिनीच्या विकासावर व नाल्याच्या विकासावर एक कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केलेला आहे शेत सर्वे नंबर ३४०/ १ हा विकसित झाला नाही त्या ठिकाणी एकही मनुष्य राहत नाही, अशा ठिकाणी सदरचा निधी खर्च करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतल्याचे दिसते. त्यामुळे सदर कामाची तात्काळ चौकशी लावावी व सर्वे नंबर ३४०/१ यामधील रस्त्याचे व नालीचे काम ताबडतोब थांबवावे त्यांचे देयक थांबवून सदर प्रकारचे किती कामे शहरात झाले, याची चौकशी करावी जनहिताचे काम करण्यापेक्षा विशिष्ट लोकांची कामे करण्यामध्ये रस असलेल्या मुख्याधिकारी यांची इथून ताबडतोब बदली करावी, अशी मागणी निवेदनातून शिवसेनेचे (शिंदे गटाचे) शहर प्रमुख अॅड. संजीव कुमार जाधव, रविकांत रुडे, कैलास कदम, संदीप ठाकरे, अनिल नरवाडे, बसवेश्वर क्षिरसागर, अॅड. अजय पाईकराव, राजु गायकवाड, सपना चौधरी, दामोधर इंगोले, श्रीनिवास शर्मा, विष्णू मते यांनी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत पालकमंत्र्यांना दिले आहे.