गौतमी पाटीलसोबत आमदार संदीप धुर्वे थिरकले; जिल्ह्यात पूरस्थिती अन्…

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली असताना भाजपचे नेते आणि पदाधिकारी गौतमी पाटीलच्या नाच गाण्यात दंग असल्याचे चित्र उमरखेडकरांनी अनुभवले. यवतमाळ : जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली असताना भाजपचे नेते आणि पदाधिकारी गौतमी पाटीलच्या नाच गाण्यात दंग असल्याचे चित्र उमरखेडकरांनी अनुभवले. आपल्या पिळदार मिश्यावर ताव मारण्यासाठी चर्चेत राहणारे आर्णी- केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलसोबत ठेका धरल्याने भाजपला जनतेच्या अडचणीशी देणे घेणे नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे.‘मिशिवाल्या आमदाराला गौतमी पाटील सोबत नाचण्याचा मोह आवरला नाही’, अशी चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे. उमरखेडमध्ये भाजप आमदार नामदेव सासाने आणि भाजप समन्वयक नितीन भुतडा यांनी मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हा दहीहंडी महोत्सव आयोजित केला होता. या दहीहंडी महोत्सवात गौतमी पाटील प्रमुख आकर्षण होती, मध्यप्रदेशचे मंत्री आणि यवतमाळ जिल्हा संघटनात्मक प्रभारी प्रल्हादसिंग पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला होती.या महोत्सवात नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेतल्याने या कार्यक्रमास नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. गौतमीचा कार्यक्रम आणि वाद हे समीकरण महाराष्ट्राला नवीन नाही. मात्र उमरखेड येथील या कार्यक्रमात चाहत्यांनी नव्हे तर चक्क सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच गौतमीसोबत मंचावर ठेका धरल्याने चाहत्यांमध्येही उत्साह संचारला. यात आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी तुफान डान्स करून धम्माल केली.
दरम्यान उमरखेड भागात भयावह पूरस्थिती असताना आमदार मात्र नाचगण्यात गुंग असल्याची टीका विरोधकांनी केली. या व्हिडीओत आमदार गौतमीच्या मागे पुढे करत नाचताना दिसत आहे. एका क्षणी गौतमी या प्रकाराला त्रासून मागे गेल्याचे दिसते. परंतु, ती पुन्हा परत येते आणि आमदारासोबत ठेका धरत असल्याचे दिसते. जिल्ह्यात यावर्षी ओला दुष्काळ सदृश स्थिती आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक गावात अद्यापही पूर परिस्थिती आहे. अशा काळात सत्ताधारी भाजप पक्ष गौतमी पाटील हिच्या सोबत ठेका धरून नाचत असल्याने त्याच्या तीव्र प्रतिक्रिया जिल्ह्यात उमटत आहेभाजप समन्वयक म्हणतात…
जिल्ह्यात पूरपरिस्थिती आहे, हे मान्य आहे. त्यासाठी मी स्वतः, भाजपचे सर्व आमदार पूरग्रस्त भागात भेट देवून परिस्थिती हाताळत आहो. गौतमी पाटील हीचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. त्यामुळे पूर परिस्थिती असली तरी सर्व नियोजन झाले असल्याने कार्यक्रम रद्द करणे संयुक्तिक नव्हते. या कार्यक्रमात आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी ठेका धरला तो उत्स्फूर्त होता, अशी प्रतिक्रिया भाजप समन्वयक व या दहीहंडी महोत्सवाचे आयोजक नितीन भुतडा यांनी दिली.