स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलमध्ये शिक्षणाचा अभाव;इयत्ता सहावी तील विद्यार्थ्यांना इंग्रजी व मराठी वाचता येईना,

शिक्षण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष्य, शाळेला मात्र पटसंख्या आणि वसुलीची चिंता!
मुख्य संपादक मो. 9021233696
उमरखेड:- हरदडा येथील स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे सपशेल दुर्लक्ष्य होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील इयत्ता सहावी ते सातवीच्या अनेक विद्यार्थ्यांना अजूनही इंग्रजी आणि मराठी भाषेतील साधे शब्द वाचता येत नसल्याचे उघड झाले आहे. या गंभीर परिस्थितीकडे शिक्षण अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली असून, शाळेचे व्यवस्थापन मात्र केवळ विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणे आणि त्यांच्याकडून शुल्क वसूल करण्यामध्येच धन्यता मानत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
एका पालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “माझी मुलगी नर्सरी पासून ते सहाव्या वर्गापर्यंत शिक्षण या शाळेमध्ये शिकत आहे व ती सहाव्या वर्गात असूनही मराठीचे पुस्तक वाचताना प्रचंड त्रास होतो. इंग्रजीचे तर त्याला अक्षरज्ञानही नाही. शिक्षकांना याबद्दल विचारले असता, त्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष्य केले. शाळेला फक्त किती विद्यार्थी आहेत आणि त्यांच्याकडून किती फी जमा झाली, यातच रस आहे.”
या गंभीर विषयावर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी याबद्दल अनभिज्ञता दर्शवली. “अद्याप आमच्याकडे याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास आम्ही नक्कीच याची गंभीर दखल घेऊ,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, पालकांचे म्हणणे आहे की यापूर्वीही त्यांनी तोंडी आणि लेखी स्वरूपात शिक्षकांना आणि प्रशासनाला याबद्दल माहिती दिली होती, परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.
शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “शाळेत विद्यार्थ्यांना वाचायला येत नसेल, तर ते शिकणार कसे? हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे आहे. शिक्षण विभागाने तातडीने या शाळेची पाहणी करून दोषींवर कारवाई करावी,” असे मत एका ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले.
स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलमधील या गंभीर शैक्षणिक दुर्लक्षाच्या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. शिक्षण विभागाने आता तरी जागे होऊन या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी ठोस पाऊल उचलावे, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे. विशेषता आरटीई च्या विद्यार्थ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पालक वर्ग करत आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाईल, यात शंका नाही. काही विद्यार्थ्यांकडे गत वर्षाची फी बाकी असल्यास फी साठी शाळेतील लिपिक वर्ग पठाणी वसुली केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर काढणे विद्यार्थ्यांचा रिझल्ट न देणे आणि विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देणे असे कार्य शाळेतील लिपिक महिला करत आहे याबाबतीत संस्थेचे अध्यक्ष डॉ. नरेश गंदेवार यांना नागरिकांनी विनंती केली की, शाळेची फी भरण्यासाठी थोडी आम्हाला एखाद्या महिन्याची सवलत देण्यात यावी अशी मागणी केली असता संस्थाचालकांनी पालकांना खडे बोल सुनावले व नाराज पालक वर्ग विद्यार्थ्यांचे ऍडमिशन काढून घेत आहे असे काही पालक वर्ग बोलून दाखवत आहे. स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल हरदडा ही फक्त भांडवलदाराची शाळा असून या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांकडून पैसा कसा कमवल्या जाईल याकडे संस्थाचालक पूर्ण लक्ष देत असल्याचा आरोप पालक वर्ग करत आहे.
उमरखेड तालुका शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेची चौकशी करून प्रत्येक विद्यार्थ्यांचे वाचन घेऊन त्या विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण बरोबर दिला जातात की नाही याची चौकशी करण्यात यावी अन्यथा विविध संघटनेमार्फत आंदोलन करण्यात येणार असल्याचे पालक वर्गातून बोलल्या जात आहे