बायपासच्या पुलाखालून जाताय; सावध रहा !

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड : शहरालगत असलेल्या साईश्रद्धानगरीलगतच्या बायपास पुलाला मोठी फट पडली आहे. त्या खालून ये. जा करणाऱ्या नागरिकांच्या डोक्यावर गिट्टी पडत आहे. नागरिकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधी संताप व्यक्त होत आहे.
उमरखेड शहरातून जात असलेला, तुळजापूर-नागपूर महामार्ग शहराच्या बाजूने काढून देण्यात आला आहे. या महामार्गावर अनुक्रमे ढाणकी रोड बायपास व तिवडी रोड बायपास या दोन्ही जागी पुलाचे निर्माण करण्यात आले आहे. त्यापैकी आठवडी बाजारातून तिवडी रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या, साईश्रद्धा नगरीलगतच्या महामार्गावरील बायपास पुलामधोमध मोठी फट निर्माण झालेली आहे. या फटीतून पावसाळ्यामध्ये पाणी पडत होते तरी त्यावर दुर्लक्ष करण्यात आले. सध्या मात्र पुलावरून वाहने जात असताना फटीतून मोठ्या प्रमाणात गिट्टी खाली पडत आहे. या दरम्यान पुलाखालून ये-जा करणाऱ्या अनेकांच्या डोक्यावर गिट्टी पडण्याच्या घटना वाढत आहेत. यामुळे एखाद्याच्या जीवावरही बेतन्याचा प्रसंग निर्माण होत आहे. याबाबत ओरड सुरू असतानाही प्रशासन उदासीन दिसत असून, मोठा निष्काळजीपणा समोर येत आहे. प्रशासनाने रस्ता निर्माण करणाऱ्या कंपनीला, या पुलाची फट योग्य रीतीने बुजवून नागरिकांना संकटातून मुक्ती मिळवून द्यावी, अशी मागणी जोर धरीत आहे.