महाराष्ट्र उद्योग संवाद’: औद्योगिक उत्कर्षाच्या दिशेने महाराष्ट्राची यशस्वी वाटचाल

मुख्य संपादक
राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीकेसी, मुंबई येथे आयोजित ‘महाराष्ट्र उद्योग संवाद’ या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोक अनेकदा विचारतात, ‘महाराष्ट्राची ताकद काय आहे?’ तेव्हा आपण आकडेवारी सांगतो – राष्ट्रीय जीडीपीमध्ये 14% वाटा, 31% परदेशी गुंतवणूक, देशातील सर्वाधिक निर्यात (तेल वगळता) आणि 25% स्टार्टअप्स – ही सर्व आकडेवारी खरी असली तरीही यामागे असलेली खरी ताकद म्हणजे महाराष्ट्रातील उद्योजक. त्यांनीच महाराष्ट्राला उद्योजकतेचे केंद्र बनवले आहे.
महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी नेहमीच पसंतीचे ठिकाण राहिले आहे. आजचा उद्योग संवाद हा केवळ विचारांचे आदानप्रदान न राहता कृतीकडे वाटचाल करणारा आहे. मागील 10 वर्षांत राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळाली आहे. गडचिरोलीचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पूर्वी औद्योगिकदृष्ट्या मागे असलेला हा जिल्हा आता स्टील हब होण्याचे स्वप्न पाहत आहे आणि आम्ही त्याला ‘नवीन स्टील सिटी’ म्हणून विकसित करत आहोत.
राज्यातील विविध औद्योगिक केंद्रांचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अमरावती हे कापसापासून फॅशनपर्यंतची टेक्टाईल व्हॅल्यू चेन विकसित करणारे केंद्र आहे. छत्रपती संभाजीनगर हे भारतातील पहिले स्मार्ट इंडस्ट्रियल टाउनशिप असून, ते ईव्ही कॅपिटल होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. नाशिक हे संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रासाठी नवा उद्योग केंद्रबिंदू ठरत असून पुणे, नवी मुंबई आणि रायगड हे ग्रीन टेक्नोलॉजी, GCCs, डेटा सेंटर्स आणि नवोन्मेष यंत्रणांसाठी महत्त्वाचे केंद्र बनत आहेत. तसेच पालघर येथे जागतिक दर्जाचे वाढवण बंदर उभारले जात आहे. हे बंदर जेएनपीटीपेक्षा तिप्पट क्षमतेने मोठे असून 20 जिल्ह्यांशी थेट जोडले जाणार आहे. यामुळे वाहतूक खर्चात मोठी बचत होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘MITRA’ या एकात्मिक सिंगल विंडो यंत्रणेचा विशेष उल्लेख करत, गुंतवणूक सुलभ करण्यासाठी ही प्रभावी व्यवस्था असल्याचे सांगितले. “वाढ हवी, पण शाश्वततेसह,” असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. गडचिरोलीमध्ये 1 कोटी झाडे लावण्याचा संकल्प आणि राज्यातील 52% ग्रीन पॉवर उत्पादन ही शाश्वत महाराष्ट्रासाठीचे महत्त्वपूर्ण टप्पे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मागील 10 वर्षांच्या विकासयात्रेत खंबीरपणे पाठीशी उभे राहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानले. तसेच, ‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र’ या उद्दिष्टासाठी महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहील, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री डॉ. उदय सामंत, मंत्री जयकुमार रावल, देशभरातील उद्योजक तसेच महाराष्ट्रातील एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.